भारत नामक राष्ट्राचा परीघ कंदाहार ते मैसूर राज्य आणि सिंध ते ब्रह्मदेश इतका विस्तीर्ण असल्याचे सिद्ध झाले. इ. स. ००१ ते १२०६ पर्यंतच्या आचार्य-राजे मंडळींना त्या वारशाचा विसर पडला; भारताच्या पदरी ७४० वर्षांचे पारतंत्र्य आले. अपवाद? तो दिव्य वारसा स्मरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा. १६८० ते १९२० या काळात तो दैदीप्यमान वारसा भारतीय पुन्हा विसरले. ब्रिटिश सत्ता आली. भारताची फाळणी झाली; आणि १९४७ ते २०१२ पर्यंत अनेक प्रश्न चिघळत राहिले. वास्तविक, ते प्रश्न सांगत राहिले आहेत : 'सर्जनशील बनून छोट्या विकास अवकाशाचेही सोने करा.. शेजाऱ्यालाही त्याच मार्गाने स्थिर करा'... हा विठ्ठलरूपी पुरोगामित्वाचा गाभा! तो सर्व भारतीयांचा. परंतु, आषाढीत घडणाऱ्या 'वारी'त तो कितीसा अधोरेखित होतो? फारसा नाही. किंबहुना, त्यामुळेच संतपुरुषांची नावे जातिभेदाच्या कुंपणात अडकवणारे नवे पुरोगामित्व उफाळले आहे..
विसाव्या शतकाच्या आरंभी व अखेरीस व्यापक स्थैर्याला आकार देणारे विठ्ठलरूपी पुरोगामित्व प्रसृत न झाल्याने भारतीय चित्रकला आणि साहित्यासारखी समाज घडवू शकणारी कलाक्षेत्रे द्विभाजित-त्रिभाजित बनली. त्यामुळे भारतीयांची सार्वजनिक-सामाजिक-राजकीय आणि राष्ट्रीय सौंदर्यदृष्टी क्षीण झाली. अशावेळी काही आत्मपरीक्षण करून मार्ग चुकल्याची कबुली देणारे विजय तेंडुलकर फक्त एकटेच! २००५ साली पुण्यात सत्कार स्वीकारताना म्हणाले : 'आम्ही समजून होतो की आम्ही आमच्या लिखाणातून नवा समाज घडवतोय! परंतु प्रत्यक्षात तसे घडत नव्हते. वेळीच ही गोष्ट लक्षात आली नाही. याचे फार दुःख होत आहे.' अर्थात ज्यांना असे आत्मपरीक्षण जमले नाही. त्यांनी विकल (अधिकृत), सकल, आणि विद्रोही साहित्य संमेलने जन्मास घातली. व्यावसायिक चित्रकलेला व्यभिचार मानले. सौंदर्यद्रोही दृश्यकलांना अभिजात मानले. भीमसेन श्रेष्ठ का कुमार? -असे अनावश्यक प्रश्न उभे केले. 'परंपरा वेगळी नवता वेगळी' -असे अट्टहासाने सांगितले. ही सारी लक्षणे 'एकमेकां साह्य करू। वाढवू अवघा कुपंथ।।' या विकृत ध्येयाची द्योतक होती. त्यांच्यात सर्जनशील पुरुषार्थ जागवणारा वारसा कुठून येणार? - रवी परांजपे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट