परंतु संपत्तीनिर्माण, संपत्तीकारक नव-सर्जनावर अवलंबून असते. आणि ते लोकमानसात आदिशक्तीचे अधिष्ठान किती, यावर ठरते. व्यापक सौंदर्यदृष्टी किती, यावर ठरते! अशा गोष्टी क्षीण झाल्या की, आर्थिक प्रश्न निर्माण होतात. नव-सर्जन नव्याने थांबते. कल्याणकारी नव्या ज्ञानाची ओढही कमी होते. ती संकुचित वृत्तीचीही बनतात. अशा वेळी, कुणापाशी किती धन-धान्य शिल्ल्क, हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. त्यानुसार माणसे गरीब-श्रीमंत ठरू लागतात. श्रीमंतांचे चंगळवादी प्रदर्शन वाढते. सुखलोलुपता वाढते. धन-धान्याचा नाश वाढतो.
हनुमानयुग संपून शिवयुगाचा आरंभ होताना, असे सारे घडलेच असेल असे नाही. परंतु सुक्ष्मातील धोके ओळखणारी दूरदृष्टी बाळगणाऱ्या वनवासी आचार्यांनी ही दुर्दैवी मानवी वाटचाल संभाव्य वाटलीच नसेल, असेही म्हणता येत नाही. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या मनातल्या आदिशक्तीस्वरूप 'शिवा'ला प्रत्यक्ष रूप देण्याचा विचार आरंभला. लोकांच्या कायमस्वरूपी मार्गदर्शनासाठी! त्यांनी प्रथम शिवमूर्तीतील प्रतिकात्मक आशय निश्चित केला. त्यामुळे, 'शिवा'चे व्याघ्रांबर भारतीयांच्या रानटी इतिहासाचे द्योतक ठरले. शिवाच्या त्रिशुळाचे मधले अग्र मानवी सर्जनशील आदिशक्तीचे द्योतक ठरले. इतर दोन वळलेली अग्रे आदिशक्तीच्या विकासाची द्योतक ठरली.
त्रिशुळावर बांधलेला डमरू लय-ताल विषयक भानाचा द्योतक ठरला. लयबद्ध गतिशीलतेचा द्योतक ठरला. समाजात वाढू शकणाऱ्या सर्प-बैल प्रवृत्तीवर काबू मिळव्ण्याचा विचार या प्रतिकात्मकतेत झाला. ज्याला जन्म लाभतो, त्याचा मृत्यू अटळ असतो, हे सांगण्यासाठी रूंडमाळ आली. निसर्ग संवर्धनाची प्रेरणा जागवण्यासाठी रूद्राक्ष माळांची योजना झाली. टाकाऊ आचार-विचार, पदार्थ अग्नीअर्पण करण्याची प्रेरणा शिव-प्रतिकावरील भस्म लेपनातून लाभतील, असा विचार झाला. कमंडलू आवश्यकतेपुरतेच धन-धान्य साठवण्याच्या प्रेरणा देण्यासाठी आला. शिवाचा जटाभार वारसा निर्माण करणाऱ्या परंपरांचे संचित नोंदवून गेला!
परंपरा पुढे जाताना वाढणारे ज्ञान विशिष्ट गतीने वाढते, हे सांगण्यासाठी चंद्रकोर शिव प्रतिकात्मकतेत आली. त्या गतीनेच वाढणारे ज्ञान महत्त्वाचे असे नोंदवणारी संथ ज्ञानगंगाही चंद्रकोरीसोबत राहिली. ही सारी लक्षणे व्यापक सौंदर्य-चैतन्यद्रोहाचे, अज्ञानाचे हलाहल पचवणाऱ्या 'महाग्यानी' माणसाची होती. परंतु भारताचे दुर्दैव, आमचा सौंदर्यद्रोह वाढला. 'महाग्यानीशिव' आमच्यात कमी निपजू लागले. आणि तिकडे, आमचे दोष लपवताना 'शिव' प्रलयंकारी ठरवला गेला.
- रवी परांजपे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट