Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 30

हनुमान युगातला ‘शिव’

$
0
0

वनवासी जीवनशैली तर चटकन सोडता येत नाही, पण स्वतःच्या कोषभेदातून प्रगतीचा मार्ग सापडला आहे. अशा मानवी अवस्थेस काय म्हणावे? 'हनुमान अवस्था'? होय, हेच वर्णन योग्य आहे! कारण, जमिनीवर जगणाऱ्या प्राणिमात्रांच्या, निसर्गाच्या कल्याणाची ज्याला आस्था आहे, चौथी मिती बाळगणाऱ्या कल्पकतेच्या आभाळात ज्याचा मुक्त संचार आहे, अशा माणसास हनुमानच म्हणायला हवे. मुद्दा हा, की अशा सृजनशील भारतीयांनी भीमबेटका गुंफाचित्र प्रकल्प संपण्याच्या बेतात असेतोपर्यंत जो हजारो वर्षांचा काळ घालवला, त्याला 'हनुमान युग'च म्हणायला हवे.
या हनुमान युगातली शेवटची ५०० वर्षे कशी असतील? काही तर्क आपण करू शकतो. वनवासी जीवन आणि नागरी जीवन यांमधील कृषिप्रधान जीवनशैली त्या ५०० वर्षांत भारतात स्थिरावली; असे आपण म्हणू शकतो. त्यामुळेच ऋतुमानाकडे, सूर्यप्रकाशाकडे आणि मान्सूनच्या ऋणाकडे भारतीयांचे लक्ष गेले. कृषिप्रधान सर्जनशीलतेकडे, अभ्यासाकडे आणि विकासाकडे आम्ही आकर्षित झालो. नदीकाठच्या सुपीक प्रदेशांचा शोध गरजेचा ठरला. 'घट'निर्मितीने कुंभारकलेला जन्मास घातले. कोंबड्या-कोंबडे, कुत्रा-मांजर, बैल-गायी असे अनेक प्राणी भारतीय कृषिप्रधान कुटुंबांचे भाग बनले. गुहेत राहणे थांबले. माणसाने स्वतःचे घर बांधले.

हा सारा विकास प्रपंच संपन्नता व स्थैर्य देणाराच ठरला. परंतु या स्थैर्यात भारतीय आपली विकास गती हरवत चालले होते काय? कृषिविकास प्रपंच वाढवणाऱ्या काळात एक प्रकारची चिंता बाळगणाऱ्या विचारवंतांना प्रश्न पडला. विकासगती कायम ठेवणारी भारतीयांची आदिशक्ती, तिला अभिप्रेत असलेली सौंदर्यभक्ती वाढत राहावयास हवी असा त्यांचा निर्णय झाला. त्यांनी कुटुंबवत्सल समाजासाठी दृश्य सौंदर्यभक्तीची पेरणी केली. घरासमोरील सडा-सारवणे, तुळशी वृंदावने, घरांवरील तोरणे-गुढी आदी गोष्टी अनिवार्य ठरवल्या. हा सारा सौंदर्यभक्ती स्पष्ट करणारा तपशीलही ऐक्यकारक ठरला. स्वतः आचार्यांनी मात्र निःसंग, सर्जनशील चिंतन चालू ठेवण्यासाठी पुन्हा राना-वनाचा रस्ता धरला. आश्रमीय अभ्यासकेंद्रे स्थापली. कृषिव्यवसायावर आधारित ग्रामजीवनाचा नव्याने अभ्यास घडू लागला. ऋतुमानावर विसंबून असणाऱ्या ग्रामजीवनातील स्थैर्य-संपन्नता कितपत विश्वसनीय मानायची? निःसंग चिंतनकारांना प्रश्न पडला कृषीविरहित उत्पादक उद्यमशीलतेलाही चालना लाभावयास हवी, असे त्यांचे मत पडले.

आता त्यांनी स्वतःच्या आदिशक्तीला नव्याने आवाहन केले. नवनिर्मितीचे नवे अवकाश शोधण्याचा विचार सुरू केला. स्वतःच्या चिंतनातील साचलेपण त्यांनी दूर केले. त्यांना 'स्व-अंतरीचा सर्जनशील कल्याणकारी प्रकाश' दिसला. आदिशक्तीच्या या नव्या रूपाला त्यांनी 'शिव' मानले. एव्हाना हनुमान युगातली शेवटची ५०० वर्षे संपली होती...
- रवी परांजपे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 30

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>